भारतातील सोनारकाम
भारतात सोने ही धातू अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असून वापरात आहे. तिला सुवर्ण वा हिरण्य असा शब्द योजलेला आढळतो.ऋग्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत आदी ग्रंथांत सोन्याचे व सोनारकामाच्या कौशल्याबाबत वारंवार उल्लेख आलेले आढळतात. त्यांतील सुवर्णालंकार किंवा वास्तुशिल्पात सोन्याचा झालेला वापर यांतील वर्णनांवरून तत्कालीन सोनारकाम कारागिरांचे कौशल्य व निपुणता लक्षात येते.
कौटिल्याच्या मते सोनारकामाचे क्षेपण, गुण व क्षुद्रक हे तीन प्रकार आहेत. हिरे-माणकांच्या जडावाच्या कामाला ‘क्षेपण’, सोन्याची तार ओढून केलेल्या कामाला ‘गुण’, तर भरीव किंवा पोकळ दागिने तयार करण्याला ‘क्षुद्रक’ असे म्हणतात. मढविणे व मुलामा देणे हे देखील सोनारकामाचे प्रकार होत. सोनारकाम करणाऱ्यांचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद इ. ठिकाणी आहे. नंतरच्या काळात सुवर्णकार व सुवर्णकर्तार असा देखील उल्लेख आढळतो. सोन्याच्या परीक्षेत हे लोक अत्यंत निपुण व तरबेज असल्याने पाणिनीने त्यांना आकर्षिक हे विशेषण लावलेले आहे. रामायणात उल्लेखिलेले पुष्पक विमान हे सोनारकाम कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अशी समजूत प्रचलित आहे की, विशिष्ट प्रक्रियेद्वारे सामान्य धातूंपासून (विशेषतः तांबे) सोने तयार करता येते. रसशास्त्रात वर्णन केलेली हेमवती ही सोने बनविण्याची विद्या आढळते. रसरत्नाकर या ग्रंथात प्रसिद्ध रसशास्त्रज्ञ नागार्जुन याने तांबे व चांदी या धातूंपासून सोने बनविण्याचे प्रयोग दिलेले आढळतात. अलंकार व आभूषणांसाठी सोन्याचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अलंकार लहान मुले, स्त्री-पुरुष तसेच पशूंसाठीही बनविले जात. बाहुभूषणे, उरोभूषणे, कुंडले, रत्नमाला, वळी, अंगठी, कंठा आदी प्रकारचे दागिने बनविण्यात तत्कालीन सोनारकाम कारागीर निष्णात होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत कर्णिका, ललातिका, अंगुलिका आदी अलंकारांचे उल्लेख आहेत. भारतातील सांची, मथुरा, भारहूत, अमरावती आदी स्तूपांतील मूर्तिशिल्पांतून आणि अजिंठा, भाजे आदी लेण्यांतील भित्तिचित्रे यांतून विविध अलंकाराचे नमुने आढळतात.
वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश (केसांत माळली जाणारी आभूषणे) ; निष्कंठ्य, निष्कग्रीव (गळ्यात घातले जाणारे) तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. घोड्यांना सालंकृत भेट देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. हत्तीच्या सुळ्यांना सोन्याने सजविले जात असे. विविध विधींसाठी सोन्याचे जानवे, गाय, पाळणा, निरांजन इ. वस्तू घडविल्या जात. स्फ्य, कुर्च इ. यज्ञात लागणारी भांडी, भोजपात्रे, विविध भांडी इ. अनेक वस्तू मुबलक प्रमाणात सोन्याच्या बनविलेल्या असत. सोनारकाम करणाऱ्यांना मूर्तिकलाही ज्ञात असे. रामायणात सुवर्णमूर्त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो. विनिमयाचे साधन म्हणून सोन्याची नाणी पाडली जात. ऋग्वेदात मना, निष्क इ. नाण्यांचा उल्लेख आढळतो, तसेच ‘शतमान’ नावाचेही नाणे होते.
भारतात धातूंचे हस्तकलाकाम हा फार प्राचीन व्यवसाय असल्यामुळे त्याची प्रचिती सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २७५०-१७५०) मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले चांदीचे फुलपात्र आणि चकचकीत सुवर्ण रत्ने यांतून येते. प्राचीन काळी सोन्याच्या मुबलकतेमुळे निरनिराळ्या वस्तू सोन्यापासून बनविल्या जात, तसेच वास्तुनिर्मितीतही सोन्याचा मुक्तपणे वापर केला जात असे. अथर्ववेदात सोन्याच्या नौकेचा व वल्ह्यांचा उल्लेख आहे. सैन्यासाठी लागणारे रथ, वाद्ये, चिलखते, शिरस्त्राणे सोन्याची बनविलेली असत. इ. स. पू. पहिल्या शतकातील सुत्तुकेनी येथील थडग्यात सुवर्ण कमळे-कलिका आणि वर्तुळाकार जाडजूड कर्णभूषणे मिळाली; तर बिमरान (अफगाणिस्तान) येथील अवशेषांत सोन्याच्या मण्यांनी-माणकांनी सुशोभित केलेली मंजूषा आढळली. गंधार (अफगाणिस्तान) कलेतील दागिन्यांवर ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव आढळतो. मध्ययुगातील मंदिर शिल्पांतून विशेषतः खजुराहो, कोणार्क, हळेबीड, सोमनाथ येथील मंदिरांतून विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आढळते. कर्नाटकातील मंदिर शिल्पांतून दागिन्यांची विशेष रेलचेल असून कारागिरीमधील कौशल्य आढळते. मुसलमानांच्या भारतातील आगमनानंतर पुनरुत्थान प्रक्रियेला सुरुवात होऊन कोफ्तगारी कलेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ती इराण-काबूलमधून (अफगाणिस्तानातून) भारतात प्रविष्ट झाली. सोन्याच्या पत्र्यांचा पृष्ठभाग खोदून जडावाचे काम तलवारींच्या मुठी, ढाली, बिचव्याची मूठ यांच्या अलंकरणासाठी करण्यात येऊ लागले. मोगल काळात (१५२६-१७०७) चिलखतींच्या अलंकरणात सोन्याचा सर्रास उपयोग उच्चभ्रूत प्रचलित झाला. मुस्लिम कारागिरांनी कुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छा दर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले (भारत इतिहास संशोधक मंडळातील कुराणाची प्रत). मोगलांनी भारतभर जवाहिरांना व सुवर्णकारांना आश्रय देऊन उत्तेजन दिले; पण त्यांतील सर्वोत्तम कारागीर आग्रा आणि दिल्ली येथे होते. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूर सिंहासन हे भारताच्या वैभवाचे द्योतक होते. उत्तर भारतात मीनाकारी कला अधिक लोकप्रिय होती. प्रदेशपरत्वे स्थानिक केंद्रातून पर्यायी भिन्न तंत्रे विकसित झाली. काश्मीरमध्ये ‘सुराही’ नामक सोन्यावर प्रक्रिया करण्याची एक विशिष्ट पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत फुलांसारखा रचनाबंध सोन्याच्या ठिपक्यांच्या चांदीच्या (ठोकलेल्या) पत्र्यांवर रेखाटण्यात येई. गुजरात, सियालकोट, जयपूर, अलवार व सिरोही या ठिकाणी कोफ्तगारी कला अद्यापि प्रसिद्ध आहे. येथील कारागीर लोखंड व पोलाद या मूळ धातूंवर सोन्याच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करतात. अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सुरई, मंजूषा, तबके, थाळ्या, चाकू, अडकित्त्ये, कातऱ्यां, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी कोफ्तगारीचा कलात्मक उपयोग या ठिकाणी केला जातो. त्रावणकोरमध्ये केस बांधावयाच्या सुवर्ण पिनांत फुलांच्या आकृतिबंधांचा उपयोग केलेला आढळतो. तसेच अन्य नीतिवचने आणि सांस्कृतिक चिन्हे उठविण्याचे कसब कलाकारांनी दाखविले आहे. लखनौ, जयपूर, त्रिचनापल्ली, तिरुपती आणि बंगलोर या शहरांतून आजही सुवर्ण कलाकाम मोठ्या प्रमाणावर होते.
मराठा अंमलात सोन्याचे सिंहासन बनविण्याची परंपरा शिवकाळापर्यंत अस्तित्वात असलेली आढळते. छ. शिवाजी महाराजांचे सुवर्णांकित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांनी बनविले होते आणि त्यावरील कलाकुसरयुक्त सुवर्णांकित छत्र या कलेची साक्ष देते; मात्र शिवकाळात अलंकार वा दागिने फार मर्यादित होते; परंतु पेशवेकाळात (१७२०-१८१८) कर्नाटक, गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल आदी प्रदेशांतील मराठ्यांच्या संचारात तेथील अलंकारांची ओळख झाली. कलगी तुरा, शिरपेच ही शिरोभूषणे, भिकबाळी, चौकडा, कर्णफुले, नथ आणि कंठी, गोफ, रत्नहार, चंद्रहार, मोहनमाळ, तन्मणी, चपलहार ही कंठभूषणे व अन्य दागिने आणि देवदेवतांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या, हिऱ्यामाणकांच्या बनविण्यात येऊ लागल्या. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणमच्या टिपू सुलतानाचे सिंहासनही सोन्याचे असून त्याच्याकडील फर्निचरवर सुवर्णांकित कलाकुसर आढळते.
विविध गोष्टींना मुलामा देण्याच्या कामासाठीही सोन्याचा वापर प्राचीन काळी होत असे. सोनारकामाचा विणकामाशीही संबंध आहे. अनेक भरजरी वस्त्रे सोन्याचा उपयोग करून विणलेली असत.
सोन्याचा अपहार करणे ही सोनारकाम करणाऱ्यांची एक प्राचीन काळापासून चालत आलेली मनोवृत्ती आहे. खोटे वजन देणे, दागिन्यातील सोने काढून त्यात हीन धातू मिसळणे, जुने दागिने वितळविताना त्यांतील सोने काढणे, सोन्याच्या पत्र्यांच्या आत शिशाचा वा तांब्याचा पत्रा घालणे इ. प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्याने दंडही सांगितला आहे, तसेच सोनारांना कोणत्या जागी बसवावे याचेही नियम त्याने ठरवून दिले आहेत.
मराठी विश्वकोश (महाराष्ट्र शासन) वरून साभार
कौटिल्याच्या मते सोनारकामाचे क्षेपण, गुण व क्षुद्रक हे तीन प्रकार आहेत. हिरे-माणकांच्या जडावाच्या कामाला ‘क्षेपण’, सोन्याची तार ओढून केलेल्या कामाला ‘गुण’, तर भरीव किंवा पोकळ दागिने तयार करण्याला ‘क्षुद्रक’ असे म्हणतात. मढविणे व मुलामा देणे हे देखील सोनारकामाचे प्रकार होत. सोनारकाम करणाऱ्यांचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद इ. ठिकाणी आहे. नंतरच्या काळात सुवर्णकार व सुवर्णकर्तार असा देखील उल्लेख आढळतो. सोन्याच्या परीक्षेत हे लोक अत्यंत निपुण व तरबेज असल्याने पाणिनीने त्यांना आकर्षिक हे विशेषण लावलेले आहे. रामायणात उल्लेखिलेले पुष्पक विमान हे सोनारकाम कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अशी समजूत प्रचलित आहे की, विशिष्ट प्रक्रियेद्वारे सामान्य धातूंपासून (विशेषतः तांबे) सोने तयार करता येते. रसशास्त्रात वर्णन केलेली हेमवती ही सोने बनविण्याची विद्या आढळते. रसरत्नाकर या ग्रंथात प्रसिद्ध रसशास्त्रज्ञ नागार्जुन याने तांबे व चांदी या धातूंपासून सोने बनविण्याचे प्रयोग दिलेले आढळतात. अलंकार व आभूषणांसाठी सोन्याचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अलंकार लहान मुले, स्त्री-पुरुष तसेच पशूंसाठीही बनविले जात. बाहुभूषणे, उरोभूषणे, कुंडले, रत्नमाला, वळी, अंगठी, कंठा आदी प्रकारचे दागिने बनविण्यात तत्कालीन सोनारकाम कारागीर निष्णात होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत कर्णिका, ललातिका, अंगुलिका आदी अलंकारांचे उल्लेख आहेत. भारतातील सांची, मथुरा, भारहूत, अमरावती आदी स्तूपांतील मूर्तिशिल्पांतून आणि अजिंठा, भाजे आदी लेण्यांतील भित्तिचित्रे यांतून विविध अलंकाराचे नमुने आढळतात.
वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश (केसांत माळली जाणारी आभूषणे) ; निष्कंठ्य, निष्कग्रीव (गळ्यात घातले जाणारे) तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. घोड्यांना सालंकृत भेट देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. हत्तीच्या सुळ्यांना सोन्याने सजविले जात असे. विविध विधींसाठी सोन्याचे जानवे, गाय, पाळणा, निरांजन इ. वस्तू घडविल्या जात. स्फ्य, कुर्च इ. यज्ञात लागणारी भांडी, भोजपात्रे, विविध भांडी इ. अनेक वस्तू मुबलक प्रमाणात सोन्याच्या बनविलेल्या असत. सोनारकाम करणाऱ्यांना मूर्तिकलाही ज्ञात असे. रामायणात सुवर्णमूर्त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो. विनिमयाचे साधन म्हणून सोन्याची नाणी पाडली जात. ऋग्वेदात मना, निष्क इ. नाण्यांचा उल्लेख आढळतो, तसेच ‘शतमान’ नावाचेही नाणे होते.
भारतात धातूंचे हस्तकलाकाम हा फार प्राचीन व्यवसाय असल्यामुळे त्याची प्रचिती सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २७५०-१७५०) मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले चांदीचे फुलपात्र आणि चकचकीत सुवर्ण रत्ने यांतून येते. प्राचीन काळी सोन्याच्या मुबलकतेमुळे निरनिराळ्या वस्तू सोन्यापासून बनविल्या जात, तसेच वास्तुनिर्मितीतही सोन्याचा मुक्तपणे वापर केला जात असे. अथर्ववेदात सोन्याच्या नौकेचा व वल्ह्यांचा उल्लेख आहे. सैन्यासाठी लागणारे रथ, वाद्ये, चिलखते, शिरस्त्राणे सोन्याची बनविलेली असत. इ. स. पू. पहिल्या शतकातील सुत्तुकेनी येथील थडग्यात सुवर्ण कमळे-कलिका आणि वर्तुळाकार जाडजूड कर्णभूषणे मिळाली; तर बिमरान (अफगाणिस्तान) येथील अवशेषांत सोन्याच्या मण्यांनी-माणकांनी सुशोभित केलेली मंजूषा आढळली. गंधार (अफगाणिस्तान) कलेतील दागिन्यांवर ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव आढळतो. मध्ययुगातील मंदिर शिल्पांतून विशेषतः खजुराहो, कोणार्क, हळेबीड, सोमनाथ येथील मंदिरांतून विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आढळते. कर्नाटकातील मंदिर शिल्पांतून दागिन्यांची विशेष रेलचेल असून कारागिरीमधील कौशल्य आढळते. मुसलमानांच्या भारतातील आगमनानंतर पुनरुत्थान प्रक्रियेला सुरुवात होऊन कोफ्तगारी कलेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ती इराण-काबूलमधून (अफगाणिस्तानातून) भारतात प्रविष्ट झाली. सोन्याच्या पत्र्यांचा पृष्ठभाग खोदून जडावाचे काम तलवारींच्या मुठी, ढाली, बिचव्याची मूठ यांच्या अलंकरणासाठी करण्यात येऊ लागले. मोगल काळात (१५२६-१७०७) चिलखतींच्या अलंकरणात सोन्याचा सर्रास उपयोग उच्चभ्रूत प्रचलित झाला. मुस्लिम कारागिरांनी कुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छा दर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले (भारत इतिहास संशोधक मंडळातील कुराणाची प्रत). मोगलांनी भारतभर जवाहिरांना व सुवर्णकारांना आश्रय देऊन उत्तेजन दिले; पण त्यांतील सर्वोत्तम कारागीर आग्रा आणि दिल्ली येथे होते. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूर सिंहासन हे भारताच्या वैभवाचे द्योतक होते. उत्तर भारतात मीनाकारी कला अधिक लोकप्रिय होती. प्रदेशपरत्वे स्थानिक केंद्रातून पर्यायी भिन्न तंत्रे विकसित झाली. काश्मीरमध्ये ‘सुराही’ नामक सोन्यावर प्रक्रिया करण्याची एक विशिष्ट पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत फुलांसारखा रचनाबंध सोन्याच्या ठिपक्यांच्या चांदीच्या (ठोकलेल्या) पत्र्यांवर रेखाटण्यात येई. गुजरात, सियालकोट, जयपूर, अलवार व सिरोही या ठिकाणी कोफ्तगारी कला अद्यापि प्रसिद्ध आहे. येथील कारागीर लोखंड व पोलाद या मूळ धातूंवर सोन्याच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करतात. अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सुरई, मंजूषा, तबके, थाळ्या, चाकू, अडकित्त्ये, कातऱ्यां, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी कोफ्तगारीचा कलात्मक उपयोग या ठिकाणी केला जातो. त्रावणकोरमध्ये केस बांधावयाच्या सुवर्ण पिनांत फुलांच्या आकृतिबंधांचा उपयोग केलेला आढळतो. तसेच अन्य नीतिवचने आणि सांस्कृतिक चिन्हे उठविण्याचे कसब कलाकारांनी दाखविले आहे. लखनौ, जयपूर, त्रिचनापल्ली, तिरुपती आणि बंगलोर या शहरांतून आजही सुवर्ण कलाकाम मोठ्या प्रमाणावर होते.
मराठा अंमलात सोन्याचे सिंहासन बनविण्याची परंपरा शिवकाळापर्यंत अस्तित्वात असलेली आढळते. छ. शिवाजी महाराजांचे सुवर्णांकित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांनी बनविले होते आणि त्यावरील कलाकुसरयुक्त सुवर्णांकित छत्र या कलेची साक्ष देते; मात्र शिवकाळात अलंकार वा दागिने फार मर्यादित होते; परंतु पेशवेकाळात (१७२०-१८१८) कर्नाटक, गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल आदी प्रदेशांतील मराठ्यांच्या संचारात तेथील अलंकारांची ओळख झाली. कलगी तुरा, शिरपेच ही शिरोभूषणे, भिकबाळी, चौकडा, कर्णफुले, नथ आणि कंठी, गोफ, रत्नहार, चंद्रहार, मोहनमाळ, तन्मणी, चपलहार ही कंठभूषणे व अन्य दागिने आणि देवदेवतांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या, हिऱ्यामाणकांच्या बनविण्यात येऊ लागल्या. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणमच्या टिपू सुलतानाचे सिंहासनही सोन्याचे असून त्याच्याकडील फर्निचरवर सुवर्णांकित कलाकुसर आढळते.
विविध गोष्टींना मुलामा देण्याच्या कामासाठीही सोन्याचा वापर प्राचीन काळी होत असे. सोनारकामाचा विणकामाशीही संबंध आहे. अनेक भरजरी वस्त्रे सोन्याचा उपयोग करून विणलेली असत.
सोन्याचा अपहार करणे ही सोनारकाम करणाऱ्यांची एक प्राचीन काळापासून चालत आलेली मनोवृत्ती आहे. खोटे वजन देणे, दागिन्यातील सोने काढून त्यात हीन धातू मिसळणे, जुने दागिने वितळविताना त्यांतील सोने काढणे, सोन्याच्या पत्र्यांच्या आत शिशाचा वा तांब्याचा पत्रा घालणे इ. प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्याने दंडही सांगितला आहे, तसेच सोनारांना कोणत्या जागी बसवावे याचेही नियम त्याने ठरवून दिले आहेत.
मराठी विश्वकोश (महाराष्ट्र शासन) वरून साभार
Comments
Post a Comment